खालापूर तालुक्यातील उंबरविरा येथून पावणेचार लाखांचा ट्रान्सफॉर्मर लंपास
सहा आरोपींना खोपोली पोलीसांनी केली अटक
खोपोली, दि. ३१ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील मौजे उंबरविरा परिसरातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीचा लाखो रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत ठाणे येथील सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून गुन्ह्याचा अधिक तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास उंबरविरा गावच्या हद्दीत ही चोरीची घटना घडली. ठाणे येथील सात जणांच्या टोळीने आपापसात संगणमत करून चोरीचा कट रचला होता. महावितरण कंपनीच्या मालकीचा आणि सुमारे ३,८०,००० रुपये किमतीचा विद्युत ट्रान्सफॉर्मर या आरोपींनी फिर्यादी किंवा महावितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता, लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून हा ऐवज लंपास करण्यात आला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सात आरोपींपैकी सहा जणांना पोलिसांनी त्याच दिवशी म्हणजेच ३० मार्च रोजी दुपारी ३:११ वाजेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ३ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्यातील एका फरार आरोपीचा शोध सुरू असून, अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार अमित सावंत हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महावितरणच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment