मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; सुकेळी खिंडीत लक्झरी बस उलटून दोघांचा मृत्यू
अतिवेग ठरला काळ; नागोठणे पोलीसांकडून तपास सुरू, २१ प्रवासी जखमी
नागोठणे, दि. ३ (महेंद्र माने) :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी खिंडीत शुक्रवारी ३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एका खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला. पनवेलहून गोव्याच्या दिशेने सुमारे ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी 'ओमकार ट्रॅव्हल्स'ची बस (क्र. एम पी १३ झेड पी ४५४५) पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकेळी खिंडीत आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. बस चालक हेमंत कुमार पाटील (३६ वर्षे) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस अतिवेगात चालवल्याने, खिंडीतील चढावावर असलेल्या वळणावर बस रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.
या दुर्दैवी घटनेत निलम विभूते आणि नईम निजाम शेख या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य २१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक आणि फॉरेन्सिक टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना सुरुवातीला नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश मारकंडे अधिक तपास करत आहेत.

Comments
Post a Comment