कल्याणच्या सौ. उज्वला पवार यांना उत्तर प्रदेशात 'बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान' प्रदान
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
सोनभद्र-उत्तर प्रदेश वृत्त (रणजीत मस्के) :- सामाजिक क्षेत्रात देशपातळीवर भरीव कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी उत्तर प्रदेशातील सोनभद्र (दुधदी) येथे १५ मार्च २०२६ रोजी 'बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मानाच्या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील कल्याण येथील प्रसिद्ध समाजसेविका सौ. उज्वला किरण पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सौ. उज्वला पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध राज्यांत जाऊन तब्बल ३५ वेळा रक्तदान केले असून, त्यांच्या या निस्वार्थी कार्याची आणि इतर सामाजिक क्षेत्रांतील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात 'कॅनॉल मॅन' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले भारतरत्न पुरस्कार प्राप्त लौगी भुईया जी, सोनभद्रचे माजी आमदार रुबी प्रसाद आणि हरीराम चेरो यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उज्वला पवार यांचे कौतुक करण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना उज्वला पवार म्हणाल्या की, मला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले याबद्दल मी प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष विकास अग्रहारी यांचे मनापासून आभार मानते. हा पुरस्कार मी माझे आई-वडील, कुटुंब, माझे मार्गदर्शक सुरेश रेवणकर सर आणि मला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित करते. तसेच 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ महादान' आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित समाजसेवकांना स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत प्रोत्साहित केले. त्यांच्या या यशामुळे कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment