वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, फिटनेस आणि कोस्टल सुरक्षेचा सशक्त संदेश
पालघर, दि १० फेब्रुवारी (प्रतिनिधी) :- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन” या राष्ट्रीय उपक्रमाने पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. राष्ट्रीय एकता, फिटनेस आणि कोस्टल सुरक्षेबाबत जनजागृती हा त्रिसूत्री संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी विशेष कौतुक केले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला मार्फत आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन सकाळी 5 वाजता दमन येथून रवाना झाली होती. या सायक्लोथॉनचे सकाळी साधारण 9 वाजता डहाणू येथे आगमन झाले. त्यावेळी सायक्लोथॉनचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छीं, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंकिता कणसे, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पोलीस निरीक्षक किरण पवार, CISF चे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम खरोखरच आगळा-वेगळा असून, CISF ने २५ दिवसांत ६,५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर सायकलिंगद्वारे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधत, कोस्टल सुरक्षेची जबाबदारी, राष्ट्रीयत्वाची भावना आणि फिटनेसचा संदेश एकत्रितपणे देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.”
दमन येथून सुरू झालेला हा सायक्लोथॉन पालघर जिल्ह्यात मुक्काम करून कोस्टल मार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, पालघर जिल्ह्यातील काही नागरिक व पोलीस दलाचे कर्मचारीदेखील या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या उपक्रमाला मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळांमधील शिक्षकांच्या सुट्टीच्या कालावधीत विशेष जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना देशसेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत अधिक माहिती मिळेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी CISF च्या संपूर्ण पथकाचे मनापासून अभिनंदन करत, “तुम्ही देशसेवेचे कार्य करत आहात. पालघर जिल्ह्यात आगमन केल्याबद्दल आणि या राष्ट्रीय मोहिमेत आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल पालघर प्रशासनातर्फे मनःपूर्वक आभार,” असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शुभेच्छा दिल्या.



Comments
Post a Comment