रत्नागिरी पोलिसांचा शीळ-मिरजोळे येथे हातभट्टीवर छापा!
८३ हजारांचा मुद्देमाल नष्ट
रत्नागिरी, दि. ३० (प्रतिनिधी) :- रत्नागिरी शहराच्या जवळच असलेल्या शीळ-मिरजोळे परिसरात नदीकिनारी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीच्या केंद्रावर रत्नागिरी शहर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात छुप्या पद्धतीने दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही मोठी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शीळ-मिरजोळे येथील नदीपात्राच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी ही हातभट्टी सुरू होती. या ठिकाणी गावठी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसायने आणि साहित्याची जमवाजमव करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकला असता, त्या ठिकाणी दारू तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दारू तयार करण्याचे साहित्य, तयार झालेली गावठी दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण ८३,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला हा सर्व मुद्देमाल आणि रसायने पोलिसांनी जागीच नष्ट करून अवैध व्यवसायाला मोठा दणका दिला आहे.
ही संपूर्ण कामगिरी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेचे प्रत्यक्ष नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांनी केले. या पथकात पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
रत्नागिरी शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे अवैधरित्या दारू गाळली जात असल्यामुळे सामाजिक आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि हातभट्टी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment